जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ; ‘लोकसेवा जन स्पंदन’चा बोरगाव येथे दिमाखात शुभारंभ
जनहित, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड पत्रकारितेचा नवा अध्याय
बोरगाव (प्रतिनिधी) : जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी, ग्रामीण भागातील सामाजिक व विकासात्मक विषयांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देत वस्तुनिष्ठ पत्रकारिता करण्याच्या उद्देशाने ‘साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदन’चा शुभारंभ बोरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
या शुभारंभप्रसंगी विविध राजकीय, सामाजिक तसेच स्थानिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी माजी सरपंच विलासराव सुरवसे, माजी उपसरपंच तथा काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मौलाली पठाण, भाजप नेते सिद्धाराम किवडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष सोमनाथ घोडके, अलाउद्दीन गवंडी, ग्रामपंचायत सदस्य राजेभाई बागवान, परमेश्वर बंदीछोडे, सचिन जिरगे, कृष्णा रणझुंजारे, शरणाप्पा गायकवाड आणि रोहिदास गायकवाड यांची उपस्थिती होती.
‘लोकसेवा जन स्पंदन’च्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या, गावपातळीवरील प्रश्न, विकासकामे, सामाजिक उपक्रम तसेच जनहिताच्या विविध विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज निर्भीडपणे मांडत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या वृत्तपत्राच्या संपादकीय टीममध्ये सहसंपादक पत्रकार विठ्ठलराव वाघमारे, मुख्य संपादक बाबासाहेब वाघमारे आणि कार्यकारी संपादक डॉ. रावसाहेब वाघमारे कार्यरत आहेत.
बोरगाव येथे झालेल्या या शुभारंभामुळे परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना आणि स्थानिक घडामोडींना एक सक्षम माध्यम मिळाले असून, ‘लोकसेवा जन स्पंदन’ हे जनतेचा आवाज बनून पुढे वाटचाल करेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
